सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.त्यातच लस उपलब्ध होण्याबाबत अनिश्चितता असल्याने गोंधळ होत आहे.तर याठिकाणी येणार्या व्यक्तींची कोणतीही आरोग्य तपासणी होत नसल्याने या गर्दीत एखादा बाधित रुग्ण असल्यास तो कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतो.त्यामुळे लसीकरणाच्या साठी ठोस नियोजन करणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
लसीकरण केंद्रांवर सकाळी सहा वाजल्यापासून लोक नंबरसाठी उभे असल्याचे चित्र आज जावली तालुक्यातील कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहायला मिळाले.सकाळी नऊ वाजे पर्यंत सुमारे १२५ लाभार्थ्यांची नोंद झाली होती. याठिकाणी आज दुपारी बारा नंतर लस येईल अशी शक्यता सांगण्यात आली.तसेच किती लस येईल याबाबत साशंकता आहे.जेवढी लस येईल तेवढ्याच लाभार्थ्यांना लस मिळेल असे सांगितले गेले.एकूणच परिस्थिती पाहता लसीकरणाच्या बाबत कोणतेही ठोस नियोजन नसल्याचे याठिकाणी प्रकर्षाने दिसून आले.
कुडाळ येथील लसीकरण केंद्रांवर परिसरातील गावातून लोक येत आहेत.सकाळी लवकर घरातुन निघावे लागते असल्याने बहुतांश लोक उपाशी पोटीच येतात.अशा लोकांना दुपारी बारा नंतर लस देऊन भर उन्हातून घरी जावे लागते.त्यामुळे कोरोनाने जाण्याऐवजी एखादी व्यक्ती अशा चुकीच्या नियोजनाची शिकार होऊ शकते.
लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच लोकांना अनावश्यक हेलपाटे होऊ नयेत म्हणून जेवढी लस उपलब्ध आहे तेवढ्याच प्रमाणात लोक बोलवावे.कुडाळ सारख्या मोठ्या लोक संख्येच्या गावात लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी असे मत कुडाळ चे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले.