सूर्यकांत जोशी कुडाळः कोरोना विरुद्धच् आता निकराची लढाई सुरू आहे. कोरोना बाधितांच्या दररोज वाढणाऱ्या संख्येला आता उपाययोजना टोकड्या पडत आहेत. वाढत्या बाधितांच्या संख्येला आँक्सिजन व व्हेन्टिलेटर असणारे बेड कमी पडत आहेत.या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून या चळवळीत प्रशासनाने लोकसहभाग घेण्याची भूमिका घेतली. प्रशासनाने जनतेला हाक देताच जिल्ह्यातील हजारो हात मदतीसाठी पुढे आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील मातीला एक आगळी वेगळी ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापणे साठी हाक दिल्या नंतर हजारो मावळे आपले प्राण तळहातावर घेऊन पुढे धावले.त्यानंतरही स्वातंत्र्य संग्राम असो की शासनाचे विविध योजना व उपक्रम असो जिल्ह्यातील जनतेने प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
आजवर गावातील भौतिक सुधारणांसाठी एकवटणारे हात आता जीवावर उठलेल्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सुद्धा तितक्याच आवेगाने पुढे सरसावले आहेत.प्रशासनाने लोकसहभागातून मदतीचे आवाहन केल्या नंतर राजकीय नेते ,पदाधिकारी ,सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य जनतासुद्धा आपल्या ऐपतीप्रमाणे खारीचा वाटा देण्यासाठी पुढे येत आहेत.प्रशासनाच्या आवाहना नंतर आठ दिवसात लोखो रुपयांची साहित्य रुपाने मदत जमा झाली आहे. कोरोनाचा मुकाबला करताना पैशांच्या जोरावर भौतिक सुविधा तात्काळ निर्माण करता येणार आहेत. परंतु या सुविधा निर्माण झाल्यानंतर त्या राबवण्यासाठी तज्ञ डॉक्टर, परिचारीका, आरोग्य सेवक व मदतनीस ,स्वच्छता कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचेही मोठे आव्हान प्रशासना पुढे असणार आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी प्रत्येक तालुक्यातील मोठ्या गावात येणारा मदतीचा ओघ पाहिल्या नंतर देणाऱ्याचे हात हजारो,दुबळी माझी झोळी।। या गीतातील ओवीचा प्रत्यय येत आहे.
