सूर्यकांत जोशी कुडाळ = कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी शासनाने निर्बंधाच्या नावाखाली अघोषित लॉकडाऊन लादला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत न येणारे व्यवसाय बंद असले तरीही जावली तालुक्यातील बाजारपेठांत नागरीकांची गर्दी कायम आहे.ही गर्दी पाहता लॉकडाऊन चा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून कुडाळ येेथील आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बाजारपेठेत शासन आदेश नाईलाजाने स्विकारत दुकानदारांनी दुकानं बंद ठेवली. केवळ अत्यावश्यक सेवा दुकानं सुरु आहेत.असे असले तरीही बाजारपेठेतील गर्दी कायम आहे.वास्तविक प्रशासनाने अत्यावश्यक आणि अनावश्यक ही वर्गवारी कोणते निकष पकडून केली हा संशोधनाचा भाग आहे.प्रत्येक व्यवसाय एकमेकांशी निगडित आहे.कोरोनाचा वाढता प्रभाव रोखणे आवश्यक आहेच.त्या बरोबर ग्रामीण अर्थचक्र चालले पाहिजे.
बांधकाम व शेती संबंधित कृषि सेवा केंद्र सुरू ठेवली पण त्याला जोडून असणारे हार्डवेअर तसेच शेतीशी निगडित इलेक्ट्रीकल साहित्य व रिपेअर दुकानं बंद ठेवली.ग्रामीण बाजारपेठांचा विचार करता कापड ,चप्पल,सराफ,भांडी अशा दुकानात दिवसात मोजकेच ग्राहक येतात.ही दुकानं बंद ठेवल्याने गर्दीवर काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.दुकान बंद ठेऊन दुकानदार आणि ग्राहक यांची गैरसोय होत आहे.
वास्तविक ग्रामीण भागातील निकष प्रशासनाने वेगळे ठेवले पाहिजेत.ग्रामीण बाजारपेठेतील दुकानदारांचा कौटुंबिक खर्च या व्यवसायांवर अवलंबून आहे.अनेक जण कर्जबाजारी आहेत.अनेकांना विविध प्रकारच्या अडचणी आहेत.नियम पाळून व्यवसाय हे छोटे दुकानदार करत असताना अशी बंदची सक्ती करणे हितावह नाही अशी नाराजी हे दुकानदार व्यक्त करत आहेत.
