
सूर्यकांत जोशी
कुडाळ ता. 18 : सर्वसामान्य जनतेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दत्तात्रय महाराज कळंबे डी.एम.के. जावळी सहकारी बँकेने आपल्या प्रगतीचा टप्पा उंचावत नवी मुंबईतील तुर्भे येथे २५ व्या शाखेचा विस्तार केला आहे. या रौप्यमहोत्सवी शाखेचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. जावळीची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेने सामान्य नागरिकांच्या विश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता सूरज पाटील, जावली बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे, शिवसेनेचे युवा नेते अंकुश बाबा कदम, बँकेचे विध्यमान अध्यक्ष विक्रम भिलारे, उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्यासह बँकेचे सर्व संचालक व अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, “दत्तात्रय कळंबे महाराजांनी लावलेले हे सहकाराचे रोपटे आज वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सभासदांचे हित जोपासणे आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे बँकेचे मुख्य ध्येय राहिले आहे. महाराजांचा वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रगतीची ही वाटचाल कायम ठेवावी. जावळीच्या नावाला उजाळा देण्याचे काम सर्वांनी एकजुटीने करावे, कारण ही बँक सर्वसामान्यांसाठी उभी राहिलेली संस्था आहे.”
यावेळी बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. तुर्भे परिसरातील नागरिकांना ही नवी शाखा अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि सुलभ बँकिंग सेवा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन समारंभाला माथाडी नेते चंद्रकांत पाटील, बळवंतराव पवार, नगरसेविका सौ. शुभांगी पाटील, नगरसेवक रविकांत पाटील, सौ. कविता पाटील, सौ. मीरा पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्यासह बँकेचे संचालक योगेश गोळे, अजित कळंबे, प्रकाश मस्कर, संतोष कळंबे, बाळासाहेब भालेघरे, विश्वनाथ धनावडे, रामचंद्र चिकणे, गणेश भोसले, विजय कदम, चंद्रकांत गवळी, विजय सावले, तुकाराम शिंदे, सौ. जयश्री मानकुमरे, सौ. उमिता रांजणे, तसेच प्रवीण शिंदे, अशोक चव्हाण व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.