सूर्यकांत जोशी कुडाळ – अंगणवाडीला निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ पुरवठा होत असल्याचे वृत्त सोशल मीडिया वरुन प्रसिद्ध होताच प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली.पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सरपंच सौ.सुरेखा कुंभार, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे,उतमराव पवार, महेश पवार तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या प्रकल्प अधिकारी यांनी इंदिरा नगर येथील अंगणवाडीला भेट दिली .
यावेळी वितरित करण्यात आलेल्या तांदूळ,डाळ व तिखट यांचे नमुने संबंधित अधिकाऱ्यांनी पदाधिकारी व ग्रामस्थांसमक्ष पंचनामा करून तपासणीसाठी पाठवले.अहवाल येण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.दरम्यान शासनाच्या माध्यमातून वितरीत करण्यात आलेल्या धान्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केले आहे.
संबंधित पुरवठादारावर कारवाई करण्यात येईल – सौरभ शिंदे
पोषन आहारात भेसळ युक्त तांदूळ व धान्य देणे ही बाब अतिशय गंभीर आहे.दोशी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याबाबतचा ठराव पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात येईल अशी माहिती पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी दिली आहे.
वितरीत धान्याची खाजगी यंञणेकडुनही तपासणी करणार – वीरेंद्र शिंदे
उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांच्या समक्ष तांदुळातील प्लास्टिक सदृश्य तांदूळ तसेच किड लागलेली मूगडाळ व निकृष्ट तिखट वितरीत होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.हे धान्य प्रशासनाने सरकारी यंञणेकडुन तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.परंतू अहवाल समाधान कारक न आल्यास खाजगी यंञणेकडुन तपासणी करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांनी दिला आहे.
