सूर्यकांत जोशी कुडाळ- 9421214450
आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. शरद ऋतूतील ही पौर्णिमा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही, तर तिच्यामागे सांस्कृतिक परंपरा आणि वैज्ञानिक आधार दडलेला आहे. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्णत्वास पोहोचतो. आकाशात उमललेला तो तेजस्वी, शीतल चंद्र म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अविष्कार आणि माणसाच्या मानसिक प्रसन्नतेचा आधार.
धार्मिक परंपरेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी घराघरांत येते आणि विचारते – “को जागर्ति?” (कोण जागा आहे?). म्हणूनच या रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. दूध पिऊन, भजन-कीर्तनात रमून, एकत्र बसून आनंद लुटण्याचा हा दिवस आहे. लक्ष्मीप्राप्तीची श्रद्धा यामागे आहे, पण खरी संपत्ती ही केवळ पैसा नसून आरोग्य, समाधान आणि एकोपा हेच खरे लक्ष्मीचे रूप आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला महत्त्व आहे. शरद ऋतूत पौर्णिमेच्या चंद्रकिरणांत औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. आयुर्वेद सांगतो की या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध पिणे शरीरासाठी लाभदायी ठरते. पित्तदोष शांत होतो, मन प्रसन्न राहते, झोप चांगली लागते. चंद्रप्रकाशाचे हे आरोग्यदायी परिणाम आजही संशोधनातून अधोरेखित होत आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा परंपरा आपल्याला थांबून विचार करण्याची संधी देतात. कोजागिरीची रात्र म्हणजे एकत्र येऊन परिवारातील नाती दृढ करण्याची वेळ. शीतल चंद्रप्रकाशात केलेला संवाद, एकत्रित हास्य-विनोद, हेच खरे जीवनाचे सुख आहे.
म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही फक्त धार्मिक किंवा पारंपरिक सण नाही. ती आपल्याला निसर्गाशी नाते जपण्याचा, आरोग्याला प्राधान्य देण्याचा आणि समाजात ऐक्य वाढवण्याचा संदेश देते.
चंद्राच्या शीतलतेसारखे आपले मनही शांत राहो, लक्ष्मीप्रमाणे आनंद व समृद्धी प्रत्येकाच्या घरी नांदो – हीच कोजागिरी पौर्णिमेची खरी प्रार्थना.
कोजागिरी पौर्णिमा – आरोग्य, आनंद आणि समृद्धीचा संदेश
LEAVE A REPLY
- Advertisment -
Yo, 88Vin fans! Found a tai88vinlink that’s working right now. Sharing the wealth! Let’s get those wins!