जावलीत येण्यासाठी कोविड टेस्ट अनिवार्य – टोम्पे
सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यात कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.त्यानुसार यापुढे परराज्यातून अथवा परजिल्हयातून जावली तालुक्यात येण्यासाठी किमान ७२ तास अगोदर कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे असा आदेश जावली तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी काढले आहेत.
सध्या आंतर्देशीय तसेच देशांतर्गत कोविड १९ चे रुग्ण मोठ्या वाढत आहेत. महाराष्ट्रात रुग्ण वाढ मोठी आहे.सातारा जिल्हयासह जावली तालुक्यात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांची वाढ होत आहे. हा संसर्ग वेळीच रोखणे आवश्यक असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी विविध निर्बंध घातले आहेत. आता जावलीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी एका स्वतंत्र आदेशानुसार परराज्य व पर जिल्हयातून येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत.कोरोना चाचणी न करता येणाऱ्याना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच चाचणी अहवाल येईपर्यंत त्यांनी विलगीकरण करुन राहणे आवश्यक आहे. या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक दक्षता समिती अध्यक्ष यांनी करणेची आहे.
शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे संभाव्य लाँकडाऊनच्या भितीने रोजीरोटीसाठी परमुलखात गेलेले जावलीतील लोक आपल्या गावी परतण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे,नागपूर, नाशिक यासारख्या मोठ्या शहरात कोरोना संसर्गाचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे शहरातून येणाऱ्या लोकांमुळे संसर्ग होऊन तालुक्यात संसर्ग साखळी वाढू नये या उद्देशाने उपविभागीय अधिकारी टोम्पे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्हयातून येणाऱ्यांसाठी कोविड १९ टेस्ट अनिवार्य केली आहे.
कोविड टेस्ट केल्या शिवाय जावलीत ‘नोएन्ट्री’
- Advertisment -