
सूर्यकांत जोशी कुडाळ,9421214450
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या स्वच्छ भारत दिवस व “स्वच्छता ही सेवा” (SHS) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यात महाश्रमदान उपक्रमाला मोठा उत्साह लाभला. तालुक्यातील सर्व गावांनी ग्रामपातळीवर स्वच्छता उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी व्हावे, यासाठी गावागावांत दर आठवड्याला स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी केले.
तालुकास्तरीय शुभारंभ
ग्रामपंचायत बामणोली तर्फे कुडाळ आणि करंदी तर्फे कुडाळ येथे तालुकास्तरीय महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ डॉ. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा तज्ञ अजय राऊत, विस्तार अधिकारी दिगंबर सुरवसे, सपना जाधव मॅडम, सरपंच श्रीमती तरडे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप कदम, श्रीमती कामथे मॅडम, बीआरसी मनोज खेडकर, संतोष जाधव, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, युवक, शासकीय कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
अस्वच्छ ठिकाणांची निवड करून मॅपिंगद्वारे ती स्वच्छ करण्यात आली.
गटविकास अधिकाऱ्यांचे आवाहन
“गावकऱ्यांनी मिळून स्वच्छतेचा संकल्प केल्यास स्वच्छ भारत मिशन प्रभावी ठरेल. ही मोहीम केवळ एक दिवसापुरती न राहता सातत्याने राबविली पाहिजे,” असे डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील गावोगावी राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता आणि जबाबदारीची भावना वृद्धिंगत होत असल्याचे दिसून आले.
—