जावलीतील तीन बाजारपेठांत दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, जीवलग मित्र ग्रुप व आम्ही जबाबदार जावलीकर या ग्रुपमधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवार पासून आठ दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.आज सलग दुसर्या दिवशी मेढा,कुडाळ व करहर या प्रमुख बाजारपेठांतील व्यवहार पूर्ण पणे कडकडीत बंद होते.
तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता एकहजारच्या उंबरठ्यावर असून तालुक्यातील पंचवीस जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेला स्वतः वर काही बंधने घालून घ्यावी लागणार आहेत.त्याचाच भाग म्हणून या जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. हा कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी दुकाने बंद असली तरीही लोकांनी ही घरात थांबणे आवश्यक आहे.
तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासना बरोबरच सामाजिक कार्यकर्ते ही पाठपुरावा करत आहेत.