सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या महिना भरात जावली तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जनता कर्फ्यू चे आवाहन केले.या आवाहनाला तालुक्यातील छोटेमोठे व्यापारी ,दुकानदार, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्यासह सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु ज्या जनतेला कोरोना पासून वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विविध उपाययोजना करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांची जनतेला मात्र कुठेही कदर असल्याचे दिसून येत नाही. बाजारपेठांतील व्यवहार ठप्प आहेत मात्र लोकांच्या रस्त्यावर असणाऱ्या मोकाट वर्दळी मुळे जनहितार्थ असलेल्या या जनता कर्फ्यूचे जनतेनेच तीन तेरा वाजवल्याचे आता बोलले जात आहे.
वास्तविक कोरोना संसर्गाच्या या भयावह परिस्थितीत जनतेने स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या हितासाठी स्वतः वर काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे.या आठ दिवसांत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याप्रमाणेच लोकांनी सुद्धा घरात थांबून प्रतिसाद देणे अपेक्षित आहे.कोरोना बाधितांना आता रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले आहे. आँक्सिजन चा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत आपण स्वतःच काळजीपूर्वक आपल्याला वाचवू शकणार आहोत.याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
कोरोनाने आता सामाजिक संसर्गाला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडताना प्रतिबंधात्मक उपाययोजना करुनच बाहेर पडले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग आता कुठेही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्यासाठी अगदी मोठ्या शहरात जायला पाहिजे असे नाही. आता स्थानिक ठिकाणी अगदी आपल्या अवतीभवती सुद्धा लक्षणे नसलेला एखादा कोरोना बाधित नकळत आपल्या संपर्कात येऊ शकतो. याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
तालुक्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी मदतीचे हात पुढे
तालुक्यातील कोरोना बाधितांना आँक्सिजन, व्हेंटिलेटर यासह विविध प्राथमिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींचे मदती साठी हात पुढे येत आहेत. लवकरच तालुक्यात या सुविधा उपलब्ध होतील. समाजातील जबाबदार घटक आपले जनतेप्रती असणारी आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. अशावेळी जनतेने सुद्धा घरातच थांबून संसर्ग रोखणे आवश्यक आहे. कोणत्याही अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय लोकांनी घरातुन बाहेर पडू नये तसेच बाहेर जाताना मास्क वापरावा. तसेच सोशल डिस्टेन्सींगच्या माध्यमातून कोरोना संसर्गापासून स्वतः चा बचाव करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
वैधला बंदी मात्र अवैधला सुसंधी
तालुक्यात आयोजित जनता कर्फ्यूत वैध उद्योगधंदे कडेकोट बंद आहेत. परंतू अवैध धंदे मात्र तेजीत सुरू आहेत. मटका, जुगार तसेच अवैध दारु विक्रीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र याबाबत कोणी बोलत नसल्याने लोकांमधुन आश्चर्य व्यक्त होत आहे.आणि याबाबत काही जण सामाजिक कार्यकर्त्यांना विचारणा करत आहेत.