सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील जनता कोरोना महामारी व अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीं हैराण झाली असतानाच तालुक्यात गेल्या महिनाभरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीसांना अद्याप यश आले नाही.त्यामुळे जनतेच्या जिवीत व वित्ताची सुरक्षा रामभरोसेच आहे.आता कोरोना बरोबरच आपल्या जिवीत व वित्ताचाही मीच माझा रक्षक म्हणून जनतेने जागरुक राहणे आवश्यक आहे.
जोशी परिवाराच्या जागरुतेने चोरट्यांचा घरफोडी चा डाव उधळला
कुडाळमध्ये गेल्या शनिवारी फोटो स्टुडिओत चोरी झाली. त्यापूर्वीही अनेक छोट्या मोठ्या चोर्या होत आहेत. तर आज मध्य रात्री ही चोरटा डाँ. जंगम यांच्या हाँस्पिटल समोरील घराच्या पत्र्यावरचढुन शेजारच्या इमारतीतील भाडेकरूच्या घरात घरफोडी करण्याच्या तयारीत होता . आम्हा जोशी कुटुंबियांना त्याची चाहुल लागताच घरातून बाहेर येऊन त्याला हटकले असता पत्र्यावरुन उडी मारून पसार झाला.त्यामुळे त्याचा चोरीचा डाव फसला. अशा प्रकारे चोर रात्रीचे जागोजागी दिसत आहेत.या चोरट्यांचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सपोनि निळकंठ राठोड व पीएसआय संतोष चामे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कुडाळ व मेढा या गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी आवाहन करताच लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आर्थिक मदत केली. त्यानुसार सीसीटीव्ही यंत्रणा कार्याण्वित करण्यात आली परंतु अनेकदा कँमेरे बंद रहात असल्याने ही यंत्रणा मोक्याच्या वेळी कुचकामी ठरत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या दुरुस्ती देखभाली साठी पोलीस यंत्रणेने निधी देणे आवश्यक आहे.
तालुक्यातील रात्र गस्त सध्या होमगार्ड शिपायांच्याच भरोश्यावर आहे. गेल्या महिनाभरात अनेक छोट्या मोठ्या चोर्या होत आहेत. रोज रात्री होमगार्ड चोरांच्या मागे पाठलाग करत पळत आहेत. परंतू हे चोर होमगार्ड शिपायांना गुंगारा देत आहेत.असे असताना पोलिसां कडून चोर पकडण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे तालुका पोलीसांच नेमक चाललय काय असाच सवाल आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
तालुक्याच्या मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि निळकंठ राठोड कोरोनाच्या प्रादुर्भावातुन नुकतेच बरे झाले आहेत तर कुडाळ पोलीस दूर क्षेत्राचे पीएसआय संतोष चामे अजूनही आजारी रजेवर आहेत.असे असतानाच या पोलीस ठाण्याची गाडीही गेल्या वर्षभरात सातत्याने नादुरुस्त राहत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मेढा पोलिसांची गाडी बंद अवस्थेत असून पोलीस अधिकार्याना गाडी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.तर गाडी अभावी गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात पोलीसांची रात्र गस्तही बंद असल्याचे दिसून येत आहे.
जावली तालुका हा अत्यंत डोंगराळ दुर्गम असून दळणवळणाची दयनीय अवस्था आहे. अशा परिस्थितीत कायदा.व सुव्यवस्था सांभाळणार्या पोलिसांना सुसज्ज वाहन असणे आवश्यक आहे.कुडाळ पोलीस दूरक्षेत्रा अंतर्गत छत्तीस गावे येत असून या दूरक्षेत्राचे पीएसआय संतोष चामे रजेवर आहेत.केवळ चार पोलीस कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.यामध्ये आठवडा सुट्टी, दिवसरात्र पाळी,आणि अन्य कामे पहाता कुडाळ पोलीस दूरक्षेत्रासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
