सूर्यकांत जोशी कुडाळ – कोणतीही निवडणूक जवळ आली की हल्ली राजकीय वर्तुळात त्याची उत्सुकता शिगेला पोहचते.यात दररोजच्या नवनवीन राजकीय घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांमध्ये स्पर्धाच सुरू असते.सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हा बॅंकेची निवडणूक चांगलीच गाजत आहे.मतदान झाले आता अगदीं काही तासांवर निकाल येऊन ठेपला आहे.तशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणूक जिल्हा स्तरावरील असली तरीही या ही राजकीय भूकंपाचा केंद्र बिंदू जावली तालुकाच आहे. काठावरचे कार्यकर्ते गुलाल तिकडं चांगभलं च्या तयारीत आहेत.
गेल्या काही वर्षांत तालुक्यातील राजकारणात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरेच किंग मेकर ठरलें आहेत. आमदार शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे यांच्या मधील वादविवाद तालुक्याला नवखा नाही.तर आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलण्यापेक्षा कृती करण्यावरच भर देतात. अनेकदा शञुला गाफील ठेवण्यासाठी सुद्धा असा नेत्यांच्या मध्ये गणिमी कावा केला जातो.मानकुमरे भाऊंचा गणिमी कावा कुणाच्या पथ्यावर पडणार हे उद्याच समजणार आहे.
गेल्या पंधरा दिवसांच्या काळात राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.अनेक दावे प्रतिदावे आव्हाने प्रति आव्हाने झाली. या पंधरा दिवसांत या नेते मंडळींना जावलीच्या भल्याची एवढी काळजी आहे. हेच मनाला कितीतरी सुखावणारे आहे.खरतर आम्ही जावलीकर भाग्यवान दोन खासदार आणि दोन आमदार आम्हाला लाभले. तर जिल्हा बॅंकेच्या गत पंचवार्षिक मध्ये तब्बल तीन संचालक जावली तालुक्यातील होते.
या संपूर्ण प्रचारात गेल्या पाच वर्षांत जावली तालुक्यातील गरीब होतकरू असणारी किती मुले जिल्हा बॅंकेत लावली याबद्दल कोणीही चकार शब्द काढला नाही.अथवा कोणी किती विकास कामे केली हेही जाहीर केले नाही.माञ तालुक्यातील विकासाचा कळवळा माञ प्रकर्षाने जाणवला.
गेले पंचवीस वर्षे महू व हातगेघर धरणाचे भिजत घोंगडे पडले आहे.आता कुठे लवकर या धरणाचे पाणी शेतात येईल अशी आशा निर्माण झाली आहे.पण या कालावधीत सत्तेवर तर हेच नेते होते.दुसरीकडे तालुक्यातील शेतकरी आणि युवकांना आशेचा किरण दाखवणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना कै लालसिंगराव शिंदे आणि चेअरमन कै.राजेंद्र शिंदे यांनी उभा केला.पण हा कारखाना सुरळीत सुरू रहावा यासाठी नेत्यांनी एकजूट दाखवली नाही.मुळातच सहकारी संस्थांचे आपण खरे मालक आहोत हेच सभासद विसरून गेला आहे.कायदेशीर बाबींच्या चक्रव्यूहातून हा प्रकल्प बाहेर काढण्यासाठी जनतेचा रेटा पाहीजे.ऊस अजिंक्य तारा नेईल का जरंडेश्वर नेईल का अजुन कोण येईल याची चर्चा करण्यापेक्षा जावली तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या हक्काचा प्रतापगड कारखाना सुरू होण्यासाठी लढा उभारला पाहिजे.तसेच जावलीची काळजी असणार्या सर्व नेते मंडळींनी चेअरमन सुनेञा शिंदे व सौरभ शिंदे यांना भक्कम पाठबळ दिले पाहिजे.या शिवाय रस्ते, पाणी,वीज यासारखी दैनंदिन जीवनातील विकास कामांचा वेगळा भाग आहेच.
बाकी आता उद्या जिल्हा बॅंकेच्या निकालानंतर पुन्हा गुलाल तिकडं चांगभलं करुयात.