सूर्यकांत जोशी कुडाळ – गेले वर्षानुवर्ष रखडलेले धरणग्रस्तांचे प्रश्न त्यातच जावळी तालुक्यातील महू आणि हातगेघर धरणग्रस्त व लाभ धारक कृती समितीच्या वतीने वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने व मदत पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद (आबा ) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महू हातगेघर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकसाठी शुक्रवार दि. 12 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांच्या समोर बैठक लावण्यात आली आहे.
महू व हातगेघर धरणग्रस्तांसोबतच जिल्ह्यातील कोयना धोम, बलकवडी, कण्हेर इत्यादी धरणग्रस्तांचे प्रश्न या बैठकीत विचारात घेतले जाणार आहेत. सदर बैठकीसाठी सकाळी 11:00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे प्रलंबित प्रश्न असलेल्या धरणग्रस्तानी वेळेपूर्वी अर्धा तास उपस्थित रहावे. शांततेत आणि विषय पत्रिकेनुसार बैठक होईल. त्यानंतर इतर विषय आदरणीय मंत्री महोदयांच्या परवानगीने घेतले जातील. असे मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.