सूर्यकांत जोशी कुडाळ : महाराष्ट्रातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये “नमो उद्यान” उभारले जाणार असून, प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शहरे व गावांमध्ये हिरवळ व नागरिकांसाठी सुसज्ज मनोरंजन स्थळे निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही योजना केवळ नगरपरिषद व नगरपंचायतींना लागू करण्यात आली आहे. जावली तालुक्यातील कुडाळ गावात महाराष्ट्रात ग्रामीण भागात लोक सहभागातून पिंपळबन व बालोद्यान निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न झालेला आहे. या उद्यानाला आजपर्यंत शासनाचा कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही हे उद्यान अधिक विकसित होण्यासाठी तसेच सुशोभित होण्यासाठी आणि त्याचे संगोपन नियमित स्वरूपी होण्यासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे तरी खास बाब म्हणून कुडाळच्या पिंपळबन उद्यानाचा समावेश या योजनेत करावा अशी मागणी कुडाळ ग्रामस्थ व पिंपळबन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील खालील नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे : सातारा, कराड, मलकापूर, वाई,महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणंद, पाटण, कोरेगाव, माण, मेढा
या योजनेंतर्गत प्रत्येक ठिकाणी हरित उद्यान, खेळण्यासाठीची साधने, पायी चालण्यासाठी पदपथ, नागरिकांसाठी विश्रांती सुविधा अशा आधुनिक सोयी उपलब्ध होणार आहेत.


