
फोटो – म्हाते खुर्द येथील लोकसहभागाच्या माध्यमातून साकारलेले साठ लाख लिटर पाणी साठवण क्षमता असणारे शेत तळे. ( सूर्यकांत जोशी कुडाळ )
जावली तालुक्यातील म्हाते खुर्द गावाने अथक प्रयत्नातून साकारली जलक्रांती – लोकसहभागातुन डोंगर माथ्यावर केली साठ लाख लिटर क्षमतेच्या शेत तळ्याची निर्मिती
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील म्हाते खुर्द गावच्या लौकिकात आणखी एका वैभवाची भर पडली आहे या गावाने गावच्या डोंगरमाथ्यावर स्वेच्छानिधीतुन १५० × १०० फुट आयताकृती आकाराचे ३० फुट खोलीचे व ६० लाख लीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या शेततळ्याची निर्मिती करुन जलक्रांती केली आहे .पावसाळ्यात विक्रमी पाऊस पडत असूनही उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भीक्ष असणाऱ्या यागावाने लोक सहभागातून पाणी संकटावर मात केली आहे. या गावच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र सरकारचे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ,हागंणदरी मुक्त गाव ,तंटामुक्त गाव , घरोघरी नळ विस्तार योजना, आपले विद्या मंदिर आयएसओ मानांकन करून शाळेला ‘अ’ दर्जा श्रेणी प्राप्त करणे ,नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात देखील म्हाते खुर्द गाव जावली तालुक्यात अव्वल स्थानी राहीले आहे.ठाणे,मुंबई,नवी मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतील जिल्ह्यामध्ये गेली २५ वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत अर्थवाहिनी बनलेली नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढीची निर्मीतीही म्हाते खुर्द या गावानेच केली आहे.अशी माहिती विकास हरिभाऊ दळवी यांनी दिली.
रोजगार हमी सारखा कायदा भारत सरकारने निर्माण केला. आर्थिक सुबत्ता,समानतेसाठी रोजगार हमी सारख्या योजनेसाठी म्हाते खुर्द गाव सातारा जिल्ह्यातील माँडेल गाव म्हणून नावारूपाला आले आहे,या माध्यमातून गावचा रु. १२ कोटी ८६ लाखाचा दशवार्षिक विकास आराखडा अतिशय नियोजनबद्धरीतीने शासकीय अधिका-यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे.जलसंधारण व जलसंवर्धनांच्या कामांमुळे म्हाते खुर्द गाव पाणीदार गाव म्हणून ओळखले जाते आहे.या सगळ्यासाठी केंद्रबिंदू ठरल्यात या गावच्या समाज व आर्थिक वाहिन्या म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळ, नवयुग विकास मंडळ , नेहरू युवा मंडळ, भजन मंडळ, भैरवनाथ क्रिकेट क्लब, महिला मंडळ, श्री भैरवनाथ जलयुक्त शिवार कमिटी या संस्था कडे पाहता येईल.म्हाते खुर्द गावाच्या या महत्वकांक्षी शेततळे प्रकल्पामुळे गाव पाणीदार होण्यास बळकटी मिळाली आहे. खरोखरच शाश्वत विकास हवा असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही. निसर्ग आपणास पाणी देतो पण ते पाणी मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आपणास प्रयत्न करावेच लागतील. शेततळे प्रकल्पाचे काम गावचे सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ महोदय यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या अमुल्य सहकार्याच्या जोरावर शक्य झाल्याची भावना सरपंच राजाराम दळवी यांनी बोलुन दाखविली.मिशन ५०० कोटी जलसाठा डॉ.उज्वल कुमार उपसंचालक आयकर विभाग महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन व रोटरी क्लब चेंबूर यांचे आर्थिक योगदान याकामी प्राप्त झाले.या प्रकल्पाचे काम करण्यासाठी खालुन सर्व आवश्यक मटेरियल डोंगरमाथ्थावर न्यावे लागले,अतिशय धोकादायक स्थितीत हा प्रवास करुन करून हा पाणीदार प्रकल्प पुर्णत्वास गेला आहे.हा प्रकल्प उभारणीसाठी ज्या दात्यांचे हात पुढे आले त्यांचेही योगदान या म्हाते खुर्द गावच्या जलक्रांतीच्या इतिहासात सुर्वण अक्षरांनी नोंदले जाईल.
