Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल

जावली तालुक्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल

   जावली तालुक्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल      

  पण धोका कायम. ८१ पैकी ६८ जणांची मात      

  ७ बळी, ६ उपचाराधीन

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना  तालुक्यातील जनतेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद दिला . त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत अनेक चढ उतारांवर मात करत तालुक्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे. तालुक्यात  आता पर्यंत ४०६ व्यक्तींचे स्वाब कोरोना तपासणी साठी घेतले होते .यामध्ये ३२५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले तर ८१ व्यक्तींचे कोरोना बाधित अहवाल आले . पैकी ६८ जण कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. तर सात जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.सध्या कोरोना बाधित ६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते यांनी दिली आहे.

 मुनावळे (कळकोशी ) व प्रभूचीवाडी कन्टेमेंट झोन मुक्त – मिनाज मुल्ला

        जावली तालुक्यातील मुनावळे ग्रामपंचायत अंतर्गत कळकोशी वस्ती व प्रभूचीवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या दोन गावांना प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध लागू केले होते. परंतू त्यानंतर निर्धारित दिवसात आज अखेर पुन्हा कोरोना रुग्ण आढळले नाहीत. त्यामुळे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या संयुक्त अहवाला नुसार या दोन गावांचे प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध शिथिल करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

            दरम्यान तालुक्यात आता पर्यंत १०,१९१  लोकांना घरात अलगीकरण करण्यात आले होते. पैकी ९००४ लोकांचा चौदा दिवसांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे.११८७  लोक अजून होम क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत ७५ लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. पैकी ६७ लोकांचा चौदा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून अजून ११ जण संस्थात्मक विलगीकरण आहेत. ग्रामस्तरीय विलगीकरण ६४८ व्यक्ती करण्यात आल्या होत्या पैकी ४२३ लोकांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. अजून ८९ व्यक्ती विविध गावातील ग्रामस्तरीय विलगीकरण मध्ये आहेत.

                      तालुक्यात  केळघर,कुडाळ, कुसुंबी, सायगांव व बामणोली  अशी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या पाचही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  उपलब्ध असणाऱ्या सुविधा द्वारे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना अंगणवाडी ,आशा सेविका यांची मोलाची साथ लाभली आहे.तर काही दिवस प्रशासनाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांनी सुद्धा आपली जबाबदारी पारपाडली आहे.

               सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला  तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अत्यंत तत्परतेने कार्यवाही केल्याने तसेच ग्रामदक्षता समित्यांच्या दक्षतेमुळे तालुक्यातील स्थानिक जनतेला कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पर्यंत होऊ शकला  नाही.साथ आटोक्यात असली तरीही धोका टळलेला नाही. त्यामुळे यापुढे ही लोकांनी गर्दी टाळणे, सोशल डिस्टेन्सींग पाळणे व मास्क वापरुन स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.

               तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी बहुतांश जण मुंबई हुन आलेले आहेत. तर काही अन्य शहरातून आले आहेत.तालुक्यातील गावागावांत दक्षता समितीने बाहेरून येणारांची सोय ग्रामस्तरीय विलगीकरणात केली. त्याला या मुंबई कर भूमीपुत्रानी सहकार्य दिले.आता मुंबई हळुहळु पूर्वपदावर येऊ लागल्याने अनेक चाकरमानी पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. परंतु आता मुंबई कडे जाताना तेथील सोयी सुविधांची पूर्ण खात्री करून जावे. अन्यथा काही लोक मुंबईत जाऊन पुन्हा गावाकडे येत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पुन्हा स्थानिक यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता जनतेतून वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page