जावली तालुक्यात दोन दिवसांत १६० जण कोरोना बाधित ;११ विद्यार्थ्यांचा समावेश
नागरीकांनी नियम पाळावेत अन्यथा कठोर कारवाई – प्रांत टोम्पे
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.दि.११ व १२ एप्रिल रोजी १६० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.या मध्ये विद्यानगर येथील धुंदिबाबा हायस्कूल मधील दहावीच्या ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागरीकांनी नियम पाळून स्वतः ची व इतरांची ही काळजी घ्यावी अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जावली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिला आहे.
तालुक्यात १३ एप्रिल पर्यंत एकूण ३५९२ जण कोरोना बाधित झाले आहेत. पैकी ३०२० जण बरे होऊन घरी गेले आहेत. ७४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे,तर सध्या ४९८ जण उपचार घेत आहेत.गेल्या आठ दिवसांत तालुक्यात आठ जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
बाजारपेठेतील गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी
लॉकडाऊनच्या धास्तीने जीवनावश्यक वस्तू खरेदी साठी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांत गर्दी होत आहे.वास्तविक लॉकडाऊन मध्ये किराणा, भाजीपाला,यासह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.त्यामुळे बाजार पेठांत गर्दी करणे हितावह ठरणार नाही.तालुक्यात सध्या रुग्णांची वाढणारी संख्या धोक्याची घंटा आहे.प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.जनतेने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी टोम्पे यांनी केले आहे.
नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई होणारच
आज रात्री पासून लॉकडाऊन ची खडक अंमलबजावणी सुरू होणार असून विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या तसेच सोशल डिस्टेंसिंग नसणारांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच असा इशारा सपोनि अमोल माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.