
सूर्यकांत जोशी, कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या जावली तालुक्यातील कावडी गावात आज जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीचा पाहणी व परीक्षण दौरा उत्साहात पार पडला. यावेळी समिती सदस्यांनी गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि नियोजनबद्ध कामाचे विशेष कौतुक केले.
गावाच्या प्रवेशद्वारावर ढोल-ताशांच्या गजरात, मान्यवरांना फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या खास स्वागताने समिती सदस्य भारावून गेले.
या दौऱ्यास मूल्यमापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती प्रियवंदा महाडदलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव, निलेश काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अनंत कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर समिती सदस्य उपस्थित होते. गावातील पाहणीनंतर स्वागत व सांगता सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्रास्ताविकात कावडी गावचे सुपुत्र वसंतराव मानकुमरे यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आपल्या खास शैलीत मांडला. त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागामुळेच कावडी गावाने तालुकास्तरावर उल्लेखनीय यश मिळविल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना समितीच्या अध्यक्षा श्रीमती प्रियवंदा महाडदलकर यांनी कावडी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले. अभियानात राबविलेल्या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी गावाला शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्याचे नेतृत्व करत असतानाही आपल्या गावाकडे विशेष लक्ष ठेवणाऱ्या वसंतराव मानकुमरे यांच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमास जावली गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे, प्रमोद पवार, विकास धोंडे, राजू गोळे, कावडी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप प्रवक्ते सुरेश गायकवाड यांनी केले.
