कोरोना योद्धा दिवंगत कांताबाई सूर्यवंशी यांच्या वारसांना पन्नास लाख रुपये मदत प्रदान

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत जबाबदारीने कर्तव्य बजावत असताना गणेशवाडी – सरताळे ता.जावली येथील कोरोना योद्धा कांताबाई तुळशीराम सूर्यवंशी यांचा कोरोना मुळे बळी गेला. शासनाच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना पन्नास लाखांचे विमाकवच देण्यात आले होते. त्यानुसार सदर पन्नास लाख रुपयांची रक्कम त्यांच्या वारसांच्या खात्यावर नुकतीच जमा करण्यात आली.तसेच दिवंगत कांताबाई सूर्यवंशी यांच्या बलीदानाबाबत आदरांजली चे प्रमाणपत्र त्यांच्या कुटुंबियांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे,तहसीलदार राजेंद्र पोळ,गटविकास अधिकारी सतीश बुद्धे,प्रकल्प अधिकारी मानसी संकपाळ उपस्थित होते.
कोविड १९ च्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक घरोघरी जाऊन जनतेच्या आरोग्याची तपासणी करण्याची जबाबदारी ,आशा व अंगणवाडी सेविकांवर होती.अत्यंत भयावह अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन या सेविका आपले कर्तव्य बजावत होत्या. याकालावधीत सर्वच कोरोना योद्ध्यांनी केलेले काम अविस्मरणीय असेच आहे. कोरोना योद्ध्यांनी दिलेल्या योगदाना मुळेच भारतात कोरोनाला थोपवने शक्य झाले. अशा परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असताना कोरोना बळी ठरलेल्या कोरोना योद्धा कांताबाई सूर्यवंशी यांचे बलीदान जावली तालुक्यातील जनतेला अविस्मरणीय राहिल असे प्रतिपादन जावली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
दरम्यान या कोरोना बळी ठरलेल्या सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळवून देण्यासाठी सातारा जावली उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला ,तत्कालीन तहसीलदार शरद पाटील ,विद्यमान तहसीलदार राजेंद्र पोळ व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
शासनाने जाहीर केलेली रक्कम कोरोना बळी ठरलेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना सुपुर्द झाली असल्याने यापुढील काळात अशा आपत्कालीन परिस्थितीत काम करताना शासकीय कर्मचारी किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी मदत होईल .असे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सांगितले.
