Thursday, February 19, 2026
HomeTop Newsप्रतापगड कारखाना निवडणुकीत दुरंगी लढत ;

प्रतापगड कारखाना निवडणुकीत दुरंगी लढत ;

१८ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात : संस्थापक सहकार पॅनलच्या 3 जागा बिनविरोध
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळी तालुक्यातील सोनगाव करंदोशी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तालुक्‍यातील आजी माजी आमदारांसह दिग्गज नेत्यांनी प्रयत्न करूनही कारखान्याची निवडणूक लागली आहे.हे प्रयत्न म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी २१ जागांसाठी एकुण ३६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे या निवडणुकीत आता संस्थापक सहकार पँनेलचे प्रमुख सौरभ शिंदे व बचाव पँनेलचे प्रमुख दिपक पवार यांच्या मध्ये सरळ दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जावळी
तालुक्यात प्रतापगड सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यामुळे चर्चेत आहे. गेल्या तीन वर्षांपासून साखर कारखान्याचे गाऴप बंद असल्याने कारखाना बंद आहे,त्यातच निवडणुक जाहीर झाल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुक्यातील अनेक दिग्ग्जांनी प्रयत्न चालविले होते. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे, त्यामुळे प्रतापगड कारखाना बिनविरोध करावा, असे आवाहन कारखान्याचे प्रमुख सैारभ शिंदे यांनी तालुक्यातील सर्व नेतेमंडळींना केले होते. त्यानुसार कारखान्याचे विद्यमान सत्ताधारी, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ,आमदार शशिकांत शिंदे व माजी आमदार सदाशिव सपकाळ आदी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या स्वतंत्र बैठकाही झाल्या होत्या, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतही बिनविरोध साठी बैठक झाली होती,
तालुक्यातील आजी माजी आमदारांच्या सर्व गटांनी एकत्र येऊन समविचारी उमेदवारांची नावे निश्चित केली होती, मात्र निवडणुक जाहीर झाल्यापासून बचाव पँनेलच्या माध्यमातून निवडणुक लढवण्याचे व सत्ताधाऱ्यांना आव्हाण निर्माण करण्याचा पवित्रा दिपक पवार यांनी घेतला होता तो शेवटपर्यंत कायम राहिला, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही तरी राजकीय घडामोडी व तडजोडी होतील व निवडणुक बिनविरोध होईल अशी आशा तालुक्यातील सभासदांना होती परंतू याबाबत पवारांशी सुरुवातीपासूनच कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगितले जात आहे. अखेर निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले .
प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी महीला राखीव मधून सौ. शोभाताई प्रमोद बारटक्के व सौ. ताराबाई ज्ञानेश्वर पोफळे या दोन महिला व सोसायटी मतदारसंघातून विठ्ठल मोरे असे एकुण तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पँनेलमधून बिनविरोध निवडून आले असल्याने आता उरलेल्या १८ जागांसाठी 13 मार्च रोजी मतदान होणार आहे.
प्रतापगड कारखान्याची निवडणूक लागल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काही नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुक प्रचाराची जोरदार मोर्चेबांधणी दोन्ही पॅनलच्या माध्यमातून सुरू आहे.
प्रतापगड कारखाना अनेक संकटांचा सामना उभारणी पासुनच करत आहे.कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम कारखान्याचे संस्थापक माजी आमदार लालसिंगराव शिंदे व चेअरमन राजेंद्र शिंदे हयात असताना यशस्वी झाला.परंतु पहिल्या गळीत हंगामापासुन हा कारखाना आर्थिक व लोकरी माव्याने नैसर्गिक संकटात सापडला.तिथुन पुढे भाडेतत्त्वावर कारखान्याचे चाक सुरू राहिले .तर गेल्या तीन वर्षांपासून गळीत हंगाम बंद राहिला आहे.परिणामी ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांची ऊस तोडणीसाठी ससेहोळपट होत आहे.कामगारांनाही वेतन नाही.त्यामुळे कारखाना सुरू होणे हे सर्वात महत्वाचे आहे.या निवडणुकीत आमनेसामने आलेल्या दोन्ही पॅनल कडुन दावे प्रतिदावे केले जात आहेत.असे असले तरीही बचाव पॅनलने दिलेले १८ उमेदवार पाहता जिल्हा बॅंकेच्या निवडणुकी प्रमाणेच या पॅनलच्या पाठीशी कोणी अदृश्य शक्ती असावी अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे व जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार हे जिल्हा परिषद कुडाळ गटातील एकमेकांचे पारंपारिक विरोधक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page