सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची रक्त तसेच विविध प्रकारच्या तपासण्या महालॅब यांच्या माध्यमातून करण्यात येतात. परंतु महा लॅबच्या माध्यमातून सदोष अहवालांमुळे रुग्णांवर चुकीचे उपचार केले जाण्याची शक्यता आहे तसेच रुग्णांना नाहक आर्थिक दुर्दंड तसेच मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदोष अहवाल देणाऱ्या महालॅब वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्वसाधारण रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी महालॅब कडे पाठवले जातात. वास्तविक शासनाच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध केलेली ही सेवा अत्यंत स्तुत्य आहे परंतु तितकीच जबाबदारीची व रुग्णांच्या जीवाशी निगडित असे आहे त्यामुळे मोफत असलं तरी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा रुग्णांच्या जीवावर बेतनारा आहे.


याबाबतच्या मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 सप्टेंबर रोजी महालॅब कडे पाठवण्यात आलेल्या रक्त तपासणीचे अहवाल सदोष असल्याचे दिसून आले आहे. हे अहवाल चुकीचे असल्याचे शंका रुग्ण व डॉक्टरांना आल्याने सदर रुग्णांचे खाजगी लॅब मध्ये रक्त तपासणी केली असता दोन्ही अहवालात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. सदर रुग्णाचे महालॅबच्या अहवालत रक्तातील हिमोग्लोबिन 4.6 असल्याचे दाखवण्यात आले. त्याच रुग्णाची त्याच दिवशी खाजगी लॅब मध्ये रक्त तपासणी केली असता हिमोग्लोबिनचे प्रमाण 11 असल्याचे निदर्शनास आले. सदर दिवशीच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनसह अन्य तपासण्यांमध्ये सुद्धा मोठे तफावत असल्याचे निदर्शनास आले आणि हे अनेक रुग्णांच्या बाबतीत घडल्याचेही निदर्शनास आले आहे तरी दिनांक 12 सप्टेंबर रोजी तपासण्यात आलेल्या रक्त अहवालाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
