सूर्यकांत जोशी कुडाळ – मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले आहे. त्याचप्रमाणे जावली तालुक्यातील महू व हातगेघर या कुडाळी नदीवरील दोन धरणात बाधित झालेल्या धरणग्रस्तांचे रखडलेले प्रश्न आणि त्यामुळे लाभक्षेत्रात पाणी येण्यास होत असलेला विलंब या पार्श्वभूमीवर धरणग्रस्तांचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला आता बळकटी येऊ लागली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात शासन व प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास सहा तारखेला अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जना बरोबरच गावोगावातील कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा महू हातगेघर धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्या नवनियुक्त समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे.


या आंदोलनाची यशस्वी सांगता व्हावी यासाठी वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे भाजपा तालुकाध्यक्ष संदीप परामणे त्याचबरोबर गावा गावचे सरपंच सर्व सदस्य सोसायटीचे पदाधिकारी यांच्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांच्या सह कुडाळ सायगाव दरे करहर कावडी अशा विविध ठिकाणी बैठकांचे सत्र सुरू आहे कोणत्याही परिस्थितीत येत्या तीन महिन्यात धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागून या धरणातील पाणी लाभक्षेत्रात जावे यासाठी हे आंदोलन छेडान्यात येत आहे.