पोलीस कर्मचाऱ्यां अभावी जावली तालुक्यातील अनेक चौक्याना टाळे. तालुक्याची कायदा आणि सुव्यवस्था राम भरोसे.
सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या दोनवर्षात जावली तालुक्यातील पोलिसांच्या संख्येत सातत्याने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम डोंगराळ तालुका अशी ओळख असणाऱ्या जावली तालुक्याची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार तालुक्याला किमान साठ पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.सध्या मेढा पोलीस ठाण्याला केवळ तीस पोलीस कर्मचारी कार्यरत असून पैकी दहाजण आजारी रजेवर आहेत.तर पाच कर्मचारी बाहेरील बंदोबस्ता वर असतात. उरलेल्या पंधरा मध्ये आठवडा सुट्टी, रात्रपाळी, आणि वयक्तिक रजेवर जाणारे पहिले तर तालुक्याची कायदा आणि सुव्यवस्था सपोनि अमोल माने उर्वरित पाच सहा सहकारी बरोबर घेऊन यांना तारेवरची कसरतच करताना पाहायला मिळत आहे.
पोलीस कर्मचारी नसल्याने तालुक्यातील पोलीस दूर क्षेत्राना लावलेल्या टाळ्यांचे दर्शन सर्वसामान्य जनतेला होत आहे. तक्रार देण्यासाठी लोकांना मेढा पोलीस ठाणे गाठावे लागत आहे. कुडाळ पोलीस दूरक्षेत्राला तीन वर्षानंतर पी एस आय मिळाले परंतु ते हजर झाले नंतर पुन्हा दिसलेच नाहीत ते सातत्याने विशेष बंदोबस्तासाठी असल्याचे सांगण्यात येते.गुन्ह्याचा तपास आणि पंचांनाम्या साठी पोलीस किती दिवसांनी येणार याची वाट पाहण्याची वेळ जावलीकरांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्या पोलीस प्रमुख तसेच लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष घालून तालुक्यासाठी आवश्यक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
जावली तालुक्यात गेल्या दोन वर्षांत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. या धंद्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकाराना धमकावण्या पर्यंत या अवैध धंदे वाल्यांची मुजोरी वाढली आहे. त्याच बरोबर चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. चोरटे मोकाट पणे वेगवेगळी गावे दर आठवड्याला टार्गेट करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच वाळूथ येथील बंद घरे चोरट्यानी फोडली होती. त्या पाठोपाठ तालुक्यातील मोठे गाव असणाऱ्या कुडाळ येथे चोरट्यानी चार बंद घरे फोडली.याबरोबरच शेतातील मोटारची चोरी तर नियमित होत आहेत. एकूणच तालुक्याची कायदा आणि सुव्यवस्था पाहता पोलीस आणि जनता दोघेही हतबल असल्याचे दिसून येत आहे.
