सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व वाई तालुक्यातील किसनवीर सहकारी साखर कारखाना यांच्यात सन 2012-13 मध्ये भागीदारी करार करण्यात आला होता. या दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळानी सामंजस्याची भूमिका घेऊन हा भागीदारी करार संपुष्टात आणला आहे. त्यामुळे प्रतापगड कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रतापगड सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्याने बँकानी लिलावाचे हत्यार उपसले होते.अशावेळी तत्कालीन किसनवीर सहकारी साखर कारखाना चेअरमन मदन भोसले व संचालक मंडळाने स्व. लालसिंगराव शिंदे यांचे या कारखान्यासह सहकारातील योगदान व शेजाऱ धर्म निभावत तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखाना सहकारातच रहावा यासाठी कारखान्याला मदतीचा हात दिला.
परंतु पुढे किसनवीर सहकारी साखर कारखानाच आर्थिक गर्तेत सापडला. पुढे याकारखान्यात सत्तान्तर झाले. दरम्यानच्या निवडणुकीत आ.मकरंद पाटील यांनी सत्तेत आल्यास प्रतापगड ला करार मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार सत्तेत येताच किसनवीर कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी प्रतापगड कारखाना करार मुक्त करण्याचे संकेत दिले. त्यानुसार प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे व संचालक मंडळाने सातत्य पूर्ण प्रयत्न करून यादोन्ही कारखाण्यामधील करार संपुष्टात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
या प्रयत्नांना यश येऊन अखेर किसनवीर-प्रतापगड साखर कारखानाची भागिदारी संपुष्टात आली.
किसनवीर चेअरमन मा.आ.मकरंद आबा पाटील व सातारा जिल्हा बॅंक चेअरमन मा.नितीन काका पाटील व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी मनापासुन आभार मानले.त्याच बरोबर यापूर्ण प्रक्रियेत आमदार शिवेंद्रसिहं राजे भोसले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद दिले.आता प्रतापगड कारखाना लवकरच शेतकरी,सभासद व कामगार यांच्यासाठी कार्यरत होत असल्याची ग्वाही सौरभ शिंदे यांनी दिली.
यावेळी प्रतापगड कारखान्याचे व्हा. चेअरमन ऍड.शिवाजीराव मर्ढेकर,संचालक राजेंद्र फरांदे पाटील, नाना पवार, आनंदराव मोहिते पाटील व संचालक उपस्थित होते.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून तरुण तडफदार नेतृत्व लाभले आहे. त्याच बरोबर संचालक मंडळात सुद्धा जुन्या जाणत्या बरोबरच तरुण तडफदार संचालक आहेत. पूर्ण संचालक मंडळातच कारखाना सुरळीत चालवण्यासाठीची उमेद आणि तळमळ दिसून येत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश यावे आणि कारखान्याचे सभासद, कामगार आणि तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी परिसरातील व्यावसायिकांच्या जीवनात लवकरच अच्छे दिन यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
