Thursday, February 19, 2026
HomeTop Newsमायेच्या शालीतून नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरेश गायकवाड यांना दिला  कर्तव्याचा संदेश… गायकवाड...

मायेच्या शालीतून नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरेश गायकवाड यांना दिला  कर्तव्याचा संदेश…
गायकवाड यांच्या  निष्ठेला प्रवक्ते पदाने  मिळाली सन्मानाची ऊब


सूर्यकांत जोशी कुडाळ  —
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झालेले, पक्षाशी निष्ठावंत राहिलेले कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांचा शाल पांघरून झालेला सत्कार हा केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो मायेचा, कृतज्ञतेचा आणि पुढील वाटचालीचा संदेश देणारा क्षण ठरला. याचवेळी या मावळ्यावर आपला विश्वास व्यक्त करताना छत्रपती शिवेंद्रसिंहराची सुरेश गायकवाड यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या जावली तालुका प्रवक्ते पदाची जबाबदारी ही सोपवली.

छत्रपतींनी आपल्या हातांनी पांघरलेली ही शाल जणू आशीर्वादांचीच ओंजळ होती. वर्षानुवर्षे निस्सीम निष्ठेने काम करणाऱ्या मावळ्याच्या खांद्यावर ठेवलेला हा सन्मान, “कर्तव्य संपले नाही, ते फक्त नवे रूप घेत आहे,” असे सांगणारा होता. शिक्षक म्हणून समाज घडवणाऱ्या सुरेश गायकवाड यांच्याकडे पाहताना छत्रपतींच्या चेहऱ्यावर दिसणारा आपुलकीचा भाव, नेतृत्व आणि माणुसकी यांचा सुरेख संगम दाखवत होता.

हा शालसन्मान म्हणजे केवळ सेवानिवृत्तीचा गौरव नव्हे, तर आयुष्यभर दिलेल्या सेवेला दिलेली मान्यताही होती. “सेवा ही पदापुरती नसते; ती मनात असते,” असा मूक संदेश या क्षणातून उमटत होता. राजकारणाच्या धावपळीतही कार्यकर्त्याच्या कष्टांची दखल घेणारे नेतृत्व आज दुर्मीळ झाले असताना, हा प्रसंग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
आणि त्या क्षणी, ज्यांच्यावर ही शाल पांघरली गेली, त्या सुरेश गायकवाड यांच्या मनात उसळणाऱ्या भावना शब्दांत मावणाऱ्या नव्हत्या. डोळ्यांत दाटलेला कृतज्ञतेचा ओलावा, चेहऱ्यावरचा अभिमानाचा शांत भाव आणि हृदयात दाटून आलेली समाधानाची लहर—या साऱ्यांतून त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचा अर्थ अधिक ठळक झाला. “आपली निष्ठा ओळखली गेली,” ही भावना त्यांच्या अंतःकरणात घर करून गेली.

हा क्षण जावळीच्या राजकीय-सामाजिक जीवनात केवळ एक बातमी ठरला नाही; तो निष्ठा, सेवा आणि मानवी स्पर्श यांचे जिवंत उदाहरण बनून राहिला. मायेच्या शालीतून दिलेला हा संदेश—सेवानिवृत्ती ही अंत नाही, तर समाजसेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे—असा ठळकपणे उमटून गेला.

 छत्रपतींनी केलेल्या या सन्मानाबाबत बोलताना सुरेश गायकवाड यांनी केली कृतज्ञता व्यक्त
महाराष्ट्राच्या राजकारणातील  कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (छत्रपती घराण्याचे वंशज बाबाराजे) यांनी माझ्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्ताने स्वतः माझ्या निवासस्थानी येऊन दिलेल्या शुभेच्छा—हा माझ्या जीवनातील अत्यंत अनमोल, गौरवशाली आणि कधीही न विसरता येणारा क्षण आहे.

राजांनी मला भावी जीवनासाठी दिलेले आशिर्वाद केवळ शब्द नव्हते; ते आत्मविश्वास वाढवणारे, नवी ऊर्जा देणारे आणि पुढील वाटचालीस दिशा देणारे होते. याच भेटीत जावली भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ते पदाच्या नियुक्तीपत्रावर त्यांनी स्वाक्षरी करून माझ्यावर पक्षाची जबाबदारी सोपवली. माझ्या संघटनात्मक कार्याची त्यांनी घेतलेली मनापासून दखल आणि दाखवलेला विश्वास—यामुळे मला मनस्वी आनंद तर झालाच, पण जबाबदारीची जाणीवही अधिक तीव्र झाली. शिक्षकी पेशातून नव्याने राजकीय क्षेत्रात येण्यासाठी ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे भाऊ आणि मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी दिलेली प्रेरणा ही सुद्धा अविस्मरणीय आहे.

“पुन्हा येईन” असे आश्वासन देत त्यांनी घेतलेला निरोप ही भेट अधिकच अविस्मरणीय ठरवून गेला. राजांनी दिलेल्या या शुभेच्छा माझ्या जीवनाला निश्चितच नवी कलाटणी देणाऱ्या आहेत. त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी आणि पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावण्यासाठी मी अधिक निष्ठेने, अधिक ताकदीने कार्यरत राहीन—हीच भावना मनात ठासून भरली आहे.
ही भेट माझ्यासाठी सन्मान, प्रेरणा आणि नव्या अध्यायाची सुरुवात ठरली आहे. असे गायकवाड यांनी राजेंच्या कर्तृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page